नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे, पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
दरम्यान ऑपरेश सिंदूरच्या यशानंतर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेले दावे भारताने फेटाळून लावले आहेत. तसेच पाकिस्तानची मागणी देखील फेटाळून लावली आहे.
भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये आमचे २६ नागरिक मारले गेले आणि ४६ जण जखमी झाले आहेत असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता, तसेच आमच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचं देखील पाकिस्तानने म्हटले होतें. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संयुक्त चौकशी करा अशी मागणी देखील पाकिस्तानने केली होती, मात्र ही मागणी आणि दावे भारतानं फेटाळून लावले आहेत.
७ तारखेच्या स्ट्राईकमध्ये नागरिक मारल्याचे पाकिस्तानकडून सांगितले जाते. पण आम्ही टार्गेट ठेवून हल्ला केला होता. काल दहशतवाद्यांचा दफनविधी होता. त्यात कोणताही सिव्हिलियन मारला गेला नसल्याचं स्पष्ट होतं. माझ्या हातात फोटो आहे. त्यात पाकिस्तानी अधिकारी आहेत. पाकिस्तानी ध्वज आहेत. मारलेल्या दहशतवाद्यांना स्टेट हॉनर दिला गेला याचे मला आश्यर्य वाटले.
धार्मिक स्थळावर हल्ले नाहीत : भारत
भारताने धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानचा हा दावा चुकीचा आहे. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळांवरच हल्ला केला आहे. दुर्देवाने पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी धार्मिक स्थळांचा सहारा घेत आहे असे मिसरी यांनी म्हटले होते. दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची संयुक्त चौकशी व्हावी अशी मागणी पाकिस्तानने केली होती, मात्र ती मागणी देखील भारताने फेटाळून लावली आहे, २६/११ आणि पठाण कोट हल्ल्यानंतर सर्व पुरावे देऊन देखील पाकिस्तानचे अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचें भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.