मुंबई : शिवसेना नेते उदय सामंत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी असण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर स्थानिक स्वराज संस्था आणि मुंबई मनपासाठी मनसे आणि शिवसेना युतीबाबत चर्चा सुरु झाली आहे.
राज ठाकरे यांना देण्यासाठी उदय सांमत यांनी बुके नेली होती. परंतु ती चूक पुन्हा नको, आधी चर्चा मग बुके असाच विषय झाला. राज ठाकरे यांनी स्वागताचा बुके आधी घेतली नव्हती. बंद दाराआड राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. शिवसेना आणि मनसे युतीबाबत गांभीर्याने चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभेला झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी आतापासून चर्चा सुरु झाली.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबाबत योग्य चर्चा झाली नसल्यामुळे दादर आणि वरळी विधानसभेमध्ये घोळ दिसून आला होता. दादर विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना शिवसेनेने सदा सर्वांकर यांना तिकीट दिले होते. त्यामुळे राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यामध्ये शाब्दीक संघर्ष दिसून आला होता. आता पुन्हा महापालिका निवडणुका चार महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपाबाबत कोणतीही चुकीची चर्चा होऊ नये, यासाठी दोन्ही राजकीय पक्ष आग्रही आहेत असे म्हटले जात आहे.
ठाकरेंकडे विकासाचे व्हिजन
शिवसेना नेते उदय सामंत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भेटीची माहिती माध्यमांना दिली. या वेळी दोन्ही नेत्यांनी अराजकीय चर्चा झाल्याचे सांगितले. राज ठाकरे यांच्यासोबत आपण चहा घेतला, खिचडी खाल्ली आणि निघालो असे उदय सामंत यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या चर्चेतून अनेक विषयांची माहिती मिळते. मुंबईचा विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा होत असते. ही आपली चौथी भेट असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.