मुंबई : फिल्मी दुनियेतील महत्त्वाचा मानला जाणारा कान्स फिल्म फेस्टिव्हलची जगभरात चर्चा आहे. हा फेस्टिव्हल सुरु होऊन नुकतेच काही दिवस उलटले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त हा महोत्सव दरवर्षी उपस्थितांच्या फॅशनने सातत्याने लक्ष वेधून घेतो. वर्षानुवर्षे भारतीय कलाकारही या महोत्सवात उपस्थिती दर्शवत आले आहेत. हा ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव येत्या २४ मे २०२५ पर्यंत चालणार आहे. उर्वशी रौतेला, नितांशी गोयलसह आता मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी देखील कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून, हा महोत्सव ग्लॅमर, प्रतिष्ठा आणि उत्तम सिनेमाचे प्रतीक आहे. छाया कदम हीचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुसरे वर्ष आहे. या सोहळ्यातील काही खास क्षणचित्रे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे. याबाबत नुकतेच सोशल मीडियावर त्यांनी काही खास फोटो शेअर करत लिहिले आहे २०२५ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलचा हा पहिला दिवस. मागच्या वर्षी बरोबर याच दिवशी माझा कान्स मधला पहिला दिवस होता. त्यावेळी अगदी नवखी असल्या सारखी वावरत होते. काही गोष्टींचे उगाचच दडपण घेतले होते. पण ते ही मी एन्जॉय केले होते. यावर्षी ही जागा हे शहर आणि इथे भेटणारी माणसे सगळे आपले आपले वाटतेय. इथल्या रस्त्यांसोबत – इथल्या रंगीबेरंगी कपडे घातलेल्या माणसांसोबत जुनी ओळख असल्या सारखे वाटतेय.
त्यानंतर पुढे छाया कदम यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, ठगेल्या वर्षीच्या कान्स फेस्टीव्हल मुळे तयार झालेले कुटुंब यावर्षी अजून विस्तारात गेल्याचे जाणवले. आता उत्सुकता आहे ती आजच्या माझ्या आणि अर्थात आपल्या स्क्रिनिंगची अशा आशयाची सुंदर पोस्ट त्यांनी लिहिली आहे.