मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे २४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण जखमी झाले आहेत. ५५ प्राण्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबईसाठी यलो अलर्ट आहे. कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि तीव्र विजांमुळे राज्यात गेल्या ४८ तासांत अनेकांनी जीव गमावला आहे. दोन दिवसांत २३ ते २४ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. पावसाचा फटका जनावरांनाही बसला असून आत्तापर्यंत ५५ प्राण्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिका-यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी १० जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पाच जणांचा वीज कोसळल्याने, तर पाच जणांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. त्याच त्याच दिवशी ११ जण जखमी झाले. त्यापैकी पाच नागरिक हे वीज कोसळल्याने, चार जण झाड कोसळल्याने जखमी झाले तर दोघे जण पाण्यात बुडून जखमी झाले. मंगळवारी आणखी १४ मृत्यू नोंदवले गेले, यामध्ये चार जणांचा वीज कोसळल्याने, एकाचा पाण्यात बुडून आणि दोघांचा झाड कोसळल्याने मृत्यू झाला.
दरम्यान राज्यातील मान्सूनपूर्व पावसाचा धडाका सुरूच असून मुंबईसाठी २२ मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला तर ठाण्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी शुक्रवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वा-याच्या झंझावाताची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी आणि शनिवारी ठाण्यासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईसाठीही शनिवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ लागू असून, यामध्ये काही ठिकाणी जोरदार सरी, विजांचा कडकडाट आणि वारे यांचा समावेश आहे.