23.9 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeमहाराष्ट्रपुढील ७ दिवस धुमशान

पुढील ७ दिवस धुमशान

पुणे : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ६ ते ७ दिवस पश्चिम किना-यावर म्हणजे गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण कोकण-गोवा किना-यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. ते उत्तरेकडे सरकण्याची आणि २३ मे २०२५ च्या संध्याकाळच्या सुमारास तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं पुढील ६ ते ७ दिवस पश्चिम किना-यावर (गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून म्हणजे २२ ते २४ मे २०२५ रोजी कोकण आणि गोव्यात आणि २४ मे २०२५ रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती
पुढील २ ते ३ दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. २२ ते २६ मे २०२५ रोजी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट ते तीव्र लाटांची परिस्थिती आहे. २२ आणि २३ मे २०२५ रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पूर्व राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढला
रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागरमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पेरणीच्या आधीच मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतक-यांची कामे देखील खोळंबोली आहेत, शिवाय आंबा बागायतदारांना देखील पावसाचा मोठा परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. हवामान विभागाकडून आज आणि उद्या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
मागील तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी वारा व विजेच्या कडकडाट पावसाने हजेरी लावीत आहे. आज सकाळपासून ढगाली वातावरण असून अकरा वाजता पासून पावसाची रिमझिम उघडीप सुरू आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली. आगामी खरीप हंगामाच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरत आहे. तर काही भागात उन्हाळी पिके आणि फळबागेळा पालेभाज्या यांना काहीसा फटका बसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR