मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश सर्व विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिका-यांना दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी गुरुवारी दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांप्रति राज्य सरकार संवेदनशील आहे. एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाने पथके गठीत करून ही कारवाई गतीने पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे जाधव पाटील यांनी सांगितले.
अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना दिलासा देण्यास राज्य सरकार नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी सन २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतक-यांना ४ हजार ८३३ कोटी रुपये तर १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ६९ लाख ३ हजार शेतक-यांना ६ हजार ९८९ कोटी रुपये तर १ एप्रिल २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत ९ लाख ७ हजार शेतक-यांना ९७५ कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती जाधव-पाटील यांनी यावेळी दिली.