बीड : बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून पवनचक्कीच्या वादातून बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचा अनुभव राज्यभरात आला आहे.
बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरण अजूनही ताजे असताना पुन्हा एकदा बीडमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एक जण गंभीर इतर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने होणा-या अशा घटनांमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील पवनचक्कीच्या वादातूनच त्यांचा खून झाला असल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादातून गोळीबार झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पोलिसांनी धडा घेतला नाही : सुषमा अंधारे
बीडमध्ये वाढती गुन्हेगारी अतिशय गंभीर आहे. काही केल्या त्याला आळा बसत नाही. ही हेलावून टाकणारी घटना असल्याचे ठाकरे गटाच्या उपनेत्या उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. विशेषत: पवनचक्कीच्या वादातून हा प्रकार झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातून अजूनही पोलिसांनी कोणताही धडा घेतलेला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गुंडांची धमक वाढली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे कधी थांबेल? असा प्रश्न त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
सर्व पिस्तुल परवाने रद्द करा : दमानिया
आता गृहमंत्र्यांनी काहीतरी मोठी पावले उचलण्याची गरज असल्याचे मला वाटते. एकानंतर एक घटना बीड मधून समोर येत आहेत. बीडमधील सर्व पिस्तुल परवाने तात्काळ रद्द करा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली आहे. ज्यांच्या जीवाला धोका असेल, त्यांना संरक्षण द्या. मात्र त्यांची पिस्तूल काढून घ्या, अशी मागणी देखील त्यांनी केली. आत्ताच्या घटकेला अनेकदा पिस्तुलाचा गैरवापर होताना दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बँड बाजा वाजला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आता बीडमध्ये फौज पाठवली पाहिजे, अशी परिस्थिती असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.