वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या गोपनीय अहवालानुसार पाकिस्तान त्याच्याकडील अण्वस्त्रांच्या साठ्याचे वेगाने आधुनिकीकरण करत आहे. तसेच पाकिस्तान भारताला आपल्या अस्तित्वासाठी मोठा धोका मानत आहे. ही रणनीती पाकिस्तानची लष्करी विचारसरणी आणि सीमेवरील त्यांच्या आक्रमकतेला दर्शवत आहे.
या रिपोर्टमधील उल्लेखानुसार पाकिस्तान मुख्यत्वेकरून चीनकडून मिळणा-या आर्थिक आणि लष्करी मदतीवर अवलंबून आहे. चीनकडून मिळणारी साधनसामुग्री आणि तांत्रिक मदतीच्या आधारावर पाकिस्तान आपल्या लष्करी सामर्थ्यासोबतच आण्विक ताकदीचाही विस्तार करत आहे.
तज्ज्ञांच्या मते, चीन आणि पाकिस्तानमधील ही आघाडी भारतासाठी सामरिकदृष्ट्या दुहेरी संकट निर्माण करत आहे. एकीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून येत असलेला दबाव आणि दुसरीकडे पाकिस्तानचा आण्विक ताकद वाढवण्याचा आणि सीमेपलीकडून अस्थिरता निर्माण करण्याचा डाव भारताचे टेन्शन वाढवणारा आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली होती. या जबरदस्त नामुष्कीनंतरही पाकिस्तान सुधरण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीेत. आता पाकिस्तानने भारतासमोर आव्हान उभं करण्यासाठी अण्वस्त्रांबाबत भयंकर डाव आखण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.