21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरमहत्त्वाच्या गाड्यांना विलंब,प्रवासी वैतागले

महत्त्वाच्या गाड्यांना विलंब,प्रवासी वैतागले

सोलापूर : सकाळची इंटरसिटी एक्स्प्रेस ही महत्त्वाची गाडी आहे. ज्या प्रवाशांना लवकर पुणे गाठायचे आहे, असे प्रवासी धावत-पळत, सकाळचा नाष्टा न करताही ही गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात; पण सोलापूर विभागातील गाड्या मागील काही दिवसांपासून उशिरा धावत आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना याचा फटका बसत आहे. यामुळे उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये लंच आणि डिनरची सोय करावी, अशी उपहासात्मक मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धेश्वर आणि हुतात्मा एक्स्प्रेस लेट होण्याची परंपरा काही केल्या थांबेनाशी झाली आहे.

रेल्वे प्रशासनाकडूनही त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यानेच गाड्या पोहोचण्यास उशीर होत आहे. यामुळे प्रवाशांमधून चीड व्यक्त केली जात आहे. मागील अनेक दिवसांपासून या ना त्या कारणामुळे सोलापूर विभागातील गाड्यांना उशीर होत आहे. काही वेळा पुणे विभागातील कामांमुळे उशीर होत आहे, तर काही वेळा नियोजनाच्या अभावामुळे हुतात्मा एक्स्प्रेस, सिद्धेश्वर आणि उद्यान, कोणार्क एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा अतिविलंबाने धावत असल्याने प्रवासादरम्यान, प्रवाशांची जेवणाची व पिण्याच्या पाण्याची खूप गैरसोय झालेली आहे.

यामुळे जर गाड्या उशिरा चालविल्या जात असतील तर रेल्वे प्रशासनाने गाडीतील सर्व प्रवाशांना नाष्टा, चहा, पाणी व जेवणाची व्यवस्था रेल्वे प्रशासनानेच करावी, अशी उपहासात्मक मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने ही बाब विचारात घ्यावी, अशी मागणीही होत आहे. गाड्यांना उशीर होत आहे. यामुळे तब्बल तीन ते चार तास प्रवाशांना रेल्वेतच जादा घालवावे लागत आहे. सर्वाधिक सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही वेळेत पोहोचणारी रेल्वेगाडी असल्याची ओळख आहे. तरीदेखील गेल्या महिन्याभरापासून ही गाडी सातत्याने लेट होत आहे. हुतात्मा एक्स्प्रेसच्या बाबतीतही तेच घडत आहे. गाड्यांना सततच विलंब होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR