नागपूर : प्रतिनिधी
शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यात यापुढे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत, असे दीपक केसरकर म्हणाले. शिक्षक एकदा शाळेवर नियुक्त झाला तर निवृत्तीपर्यंत एकाच शाळेवर राहण्याची मुभा यापुढे शिक्षकांना असणार आहे, असे ते म्हणाले. यासोबतच येत्या २० डिसेंबरपासून राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.
यासोबतच निवडणूक आयोग आणि जनगणना व्यतिरिक्त इतर कोणतीही शासकीय कामे शिक्षकांना विभागाच्या परवानगीशिवाय देता येणार नाही, असे सांगतानाच केसरकरांनी जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणे हे राज्य सरकारचे धोरण नाही. एक विद्यार्थी असेल तरीही शिक्षक मिळेल. जेथे प्रवासाचा प्रश्न असेल त्या विद्यार्थ्याला शाळेत पोहोचवणे ही शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असणार आहे, असे म्हटले.
यासोबतच राज्यातील शाळाबा अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात शाळेत चला अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी विधानसभेत दिली. शाळाबा मुलांबाबतचा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.
राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू
राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.