नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये क्वॉलीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. काल (शुक्रवारी) मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली.
क्वॉलीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटोपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात होते त्यावेळी भीषण अपघात झाला. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील मृतांची नावे :
अजय दशरथ चिखले (वय ४५), विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५), सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२), रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८), मयुर मोरेश्वर इंगळे (वय २६), वैभव साहेबराव चिखले (वय ३२)ै
मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका कारमधून सात जण नागपूरहून काटोलच्या दिशेने प्रवास करत होते. नागपुरात एका लग्नासाठी हे सातही जण आले होते. रात्री उशिरा नागपुरातील लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते आपल्या घरी निघाले होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. नागपूरहून काटोलच्या दिशेने जात असताना समोरून येणा-या एका ट्रकने कारला धडक दिली.
ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रामा सेंटरमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात क्वॉलीस गाडीचा चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना अपघातासंदर्भात माहिती देण्यात आली. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.