24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरअतिरिक्त लागवड खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला

अतिरिक्त लागवड खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला

शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख

सततच्या संकटामुळे शेती व्यवसाय करणे अत्यंत किचकट आणि जिकिरीचे झाले आहे. यात नफा तर फारच दूर मात्र शेतात घातलेला लागवड खर्च भरून निघण्याची देखील शाश्­वती राहिली नसल्याने निसर्गापुढे शेतकरी हतबल झाला आहे. त्यात यंदा आंतरमशागत व फवारणीच्या अतिरिक्त लागवड खर्चामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात गेल्या आठवड्यात हवामान बदल झाल्याने रब्बीतील पिकांना कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यावर प्रतिबंधात्मक उपायांसाठी शेतकरी कृषी केंद्रात जाऊन महागडे कीटकनाशक खरेदी करून फवारणी करीत असले, तरी त्याचा कीडरोगावर प्रभाव पडत नसल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून शेतक-यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान यंदा जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा निसर्गाच्या दुष्ट फे-यात अडकला आहे. हा फेरा त्याच्यासाठी नवा नसला तरी पण यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे खरीप हंगामातील नगदीचे पिक असलेले सोयाबीन हातचे गेले असून त्यात तूर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने खरीप हंगामातील लागवड खर्च निघणे कठीण झाले.

खरीपातील नुकसान रब्बी हंगामात निघेल अशी शेतक-यांना आशा होती. मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकांची वाढ खुंटली. परिणामी हरभरा पिकांवर महागडी औषध फवारणी करून पिके जगविण्यासाठी बळीराजाची धडपण सुरू आहे. मात्र रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने औषध फवारणी देखील निकामी ठरत असल्याने निसर्गापुढे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी आधुनिकतेकडे वळला असला तरी त्याच्या जीवनात आणखी ही आर्थिक स्थैर्य आले नाही. निसर्गाचा लहरीपणा, अत्यल्प पर्जन्यमान, अतिवृष्टी अशा अनेक कारणामुळे शेती करणे अडचणीचे ठरत आहे. त्यात पिकलं तरी मालाला योग्य भाव मिळत नसल्याने सध्या शेतीतून लागवड खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. घटलेले उत्पन्न, वाढता लागवड खर्च, बाजारात पिकांंना नसलेला भाव यातून निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेमूळे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR