मुंबई : बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे संपूर्ण ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन केले. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणा-या ‘वंदे मातरम’ या गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने राजभवन येथे वंदे मातरम या गीताच्या सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम’ गीताचे गायन
जात, पंथ, धर्म, भाषांचे भेद विसरून स्वातंर्त्यलढ्यात सर्वांनी वंदे मातरम म्हटले होते. वंदे मातरम हा स्वातंत्र्यलढ्याचा परवलीचा शब्द होता आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्यही याच गीतातून तयार झाले. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि एकात्मता आवश्यक आहे. यासाठी ‘वंदे मातरम’च्या सामूहिक गायनाने संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामूहिक वंदे मातरम गीत गायनप्रसंगी केले.
मंत्रालयात वंदे मातरम गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित सामूहिक ‘वंदे मातरम’ गायनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सांस्कृतिक कायर्Þ, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश कुमार, पद्मश्री पद्मजा फेणानी-जोगळेकर यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

