28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयमाहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नैराश्याचे सावट

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नैराश्याचे सावट

कंपन्यांमध्ये ना पगारवाढ ना पदोन्नती जागतिक मंदीच्या भीतीने कर्मचारी चिंतेत

बंगळूरू : आयटी क्षेत्रात आलेल्या जागतिक मंदीच्या भीतीने कर्मचारी चिंतेत आहेत. इन्फोसिससह अनेक मोठ्या कंपन्यांनी यंदा पगार वाढवला नाही तसेच पदोन्नतींची संख्या देखील कमी केली आहे. कंपन्या नवीन कर्मचा-यांना कामावर घेण्यास उत्सुक नाहीत किंवा त्यांनी यावर्षी त्यांच्या कर्मर्चा­यांना कोणतीही वेतनवाढ किंवा पदोन्नती दिली नाही. त्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी निराश आहेत.

बंगळुरुमधील इन्फोसिसने पगारवाढ आणि पदोन्नतीचा निर्णय यावर्षी उशिरा घेतला. परंतु, यंदा पगारात १० टक्क्यांहून कमी वाढ झाल्याने कर्मचा-यांची निराशा झाली आहे. इन्फोसिसने पगारवाढीचे पत्र देतानाच कर्मचा-यांनी कठीण काळात साथ दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. तर काही आयटी कंपन्यांनी पगारवाढ केली नाही. त्यामुळे या क्षेत्रातील जागतिक मंदीचा परिणाम गरीब कर्मचा-यांवर झाला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिका आणि युरोपमधील अनेक मोठ्या आयटी कंपन्यांचे मुख्यालय बंगळुरुमध्ये आहे.

आयटी क्षेत्रात जवळपास ६० टक्के खर्च फक्त कर्मचा-यांवर होतो. हा मोठा खर्च हाताळण्यासाठी आयटी कंपन्यांनी यावर्षी कमी पगारवाढ दिली आहे. याशिवाय पदोन्नतींची संख्याही कमी करण्यात आली आहे. अलीकडेच अनेक अहवाल आले आहेत, ज्यावरून असे दिसून आले आहे की या वर्षी आयटी कंपन्या नवीन नियुक्ती करण्यात रस दाखवत नाहीत.

मंदिवर मात होण्याची आशा
मंदीचा हा ट्रेंड जवळपास वर्षभर सुरू आहे. मात्र, येत्या सहा महिन्यांत मंदीवर मात होईल, असा आशावाद कंपन्यांना आहे. मात्र तोपर्यंत परिस्थिती बिघडू नये म्हणून कंपन्या खबरदारी घेत आहेत. यंदा नवीन कर्मचा-यांना पगारवाढ देण्यात आलेली नाही.

पदोन्नत्या थांबविल्या
एका आयटी कर्मचा-याच्या मते, दरवर्षी कंपन्या पगारात सुमारे २० टक्के वाढ करतात. एखाद्याला प्रमोशन मिळाले तर त्याचा पगार ५० टक्क्यांनी वाढतो. यावर्षी अनेक पदोन्नती थांबविण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांना पदोन्नती मिळाली त्यांना केवळ १० ते २० टक्के पगारवाढ देण्यात आली.

केवळ २० टक्के पगारवाढ
यावर्षी कंपन्यांनी नोक-या बदलणा-यांना केवळ २० टक्के पगारवाढ दिली आहे. पूर्वी हा आकडा ४० टक्क्यांपर्यंत असायचा. काही प्रकरणांमध्ये, पगारात १०० ते १२० टक्के वाढ झाली. २०२३ मध्ये २००७ ते २००९ सारखीच परिस्थिती राहील. या दोन वर्षांत आयटी क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे.

एआयमुळे आयटी व्यावसायिक चिंतेत
एका आयटी कंपनीच्या एचआर मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे नोक-या गेल्या आहेत. यामुळे आयटी व्यावसायिक चिंतेत आहेत. ही अवस्था कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही. कोरोना महामारीच्या काळात आयटी कर्मचा-यांची मागणी खूप वाढली होती. कंपन्यांकडून लोकांना महागड्या कार, बाईक अशा भेटवस्तूही मिळाल्या होत्या. पण सध्या परिस्थिती बदलल्याचे चित्र दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR