कोल्हापूर : भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पुढाकार होता, असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांनी केला आहे. तर आव्हाडांना पक्षात कोणीही विचारत नाही, अशी टीका देखील मुश्रीफांनी यावेळी केली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट झाल्याचे देखील वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
मंत्री हसन मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहेत. आरोप करताना मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाडांवर एकेरी शब्दात हल्लाबोल केला आहे. यालाच सगळं कळतंय का? असे म्हणत एकेरी शब्दात टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले, जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही. एकाकी पडल्यामुळे ते भ्रमिष्ट अवस्थेत आहेत.
आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्यासोबत जावे यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी आमदारांनी सह्या केल्या त्या पेपरवर जितेंद्र आव्हाडांची सही एक नंबरला होती. आम्ही भाजपसोबत जाणार त्यावेळी झालेल्या चर्चेत जितेंद्र आव्हाड नव्हते. माझा भाजपसोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रिपदाची शपथ घेतली असती का? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे.