इम्फाळ : गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. येथील न्यू लांबुलेन येथील चार घरे आगीमुळे जळून खाक झाली आहेत. हिंसाचार सुरू झाल्यापासून या घरात कोणीही वास्तव्यास नव्हते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे एका अधिका-याने सांगितले.
अग्निशमन दलाच्या किमान तीन गाड्या घटनास्थळी हजर होत्या. मात्र आग कशी लागली हे समजू शकलेले नाही. आगीचे कारण शोधण्यासाठी तपास करण्यात येणार आहे. ही घरे एका विशिष्ट समाजाची असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ३ मे रोजी उसळलेल्या हिंसाचारापासून या जागा रिक्त आहेत. मालमत्तेच्या नुकसानीचेही मूल्यांकन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही घटना परिसरातील शांतता बिघडवण्याचा कट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.