नाशिक : प्रतिनिधी
आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या बजेटवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नवे पालकमंत्री जे नेमले आहेत, ते आता स्वत:ला नाशिकचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी काही मोठे बंगले वगैरे घेतल्याचीही चर्चा आहे, असा टोला अप्रत्यक्षपणे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे.
कुंभमेळ्याच्या तयारीवर आणि खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना चव्हाण म्हणाले की, गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी अंदाजे ३ हजार ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला होता. त्यावेळी सुमारे ४० लाख भाविक आले होते. आता सरकारने थेट ३५ हजार कोटींचे बजेट काढले आहे आणि ६ कोटी लोक येतील असा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात किती लोक येणार, याचा सरकारने काही अभ्यास केला आहे का? याचा कोणताही ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार करण्यात आलेला नाही.
समृद्धी महामार्गाचा दाखला देत चव्हाणांनी थेट सरकारच्या हेतूवरच शंका घेतली. ‘कुंभमेळा हा हिंदू धर्माचा पवित्र सण आहे, मोठ्या संख्येने लोक येतात आणि आवश्यक तो खर्च व्हायलाच हवा. पण सध्याचा विषय फक्त पैसे खाण्याचा आणि टेंडर काढण्याचा आहे. कुठली मोठी कॉन्ट्रॅक्ट्स कोणाला दिली? सब-कॉन्ट्रॅक्ट्स कुणाला दिली? हे सर्व संशयास्पद आहे. समृद्धी महामार्गही लोकांच्या भल्यासाठी होता की फक्त कंत्राटदारांसाठी? असा प्रश्न पडतो,’ असे चव्हाण म्हणाले.
काँग्रेस कमिटी करणार खर्चाचे विश्लेषण
३५ हजार कोटींचे हे बजेट अतिशय शॉकिंग आहे. तुम्ही नाशिककरांना विचारले आहे का की त्यांना नेमके काय पाहिजे? यावर पब्लिक रिपोर्ट घेऊन उघड चर्चा झाली पाहिजे. मी काँग्रेस कमिटीला या संपूर्ण प्रकरणाचे अॅनालिसिस (विश्लेषण) करायला सांगणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.
पक्षफोडीवरूनही सरकारवर निशाणा
यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील पक्षफोडीच्या राजकारणावरूनही सत्ताधा-यांना धारेवर धरले. विरोधी पक्षांचे संख्याबळ आधीच कमी आहे, त्यातही सत्ताधा-यांकडून सातत्याने फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे, अशी खंत व्यक्त करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.















