पुणे : नाट्यसंमेलन साजरे होण्यास उशीर झाला. परंतु हे संमेलन निर्विघ्न होत आहे त्याचा आनंद आहे. काळानुरूप नाटक बदलत गेली कौटूंबिक नाटकासह आता ऐतिहासिक नाटके ही होत आहेत. नवनवीन विषय नाटकात येत आहेत. असे शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार उद्घाटन सोहळ्यादरम्यान म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकावर अप्रत्यक्ष टीका केली.
वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, घरकुल योजना करावी, नाट्यगृहाच्या भाड्याच्या बाबतीत विचार करावा, यासाठी विशेष अनुदान देण्यात यावे, असे शरद पवार म्हणाले.
रायगडाला जेव्हा जाग येते…
शरद पवार ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकावर अप्रत्यक्ष टीका करत म्हणाले, वसंत कानेटकर यांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा’ हे नाटक महाराजांच्या कौटुंबिक बाबींवर अधिक भाष्य करते, परंतु आज महाराज अधिक हतबल झालेले दाखवले असे भासते, ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ या नाटकात जाग म्हणजे ‘उभारी’ असा अर्थ अभिप्रेत आहे… मात्र त्यामध्ये महाराजांचे शल्य अधिक दाखवले आहे, मी हे नाटक दिल्लीत पाहिले, सध्याचे प्रेक्षक महाराजांना कुटुंब कलहातील का दाखवले असा प्रश्न विचारतील, आणि पुरावे ही मागतील.
शरद पवार पुढे म्हणाले, ऐतिहासिक नाटकाची प्रेक्षक वाट पाहतो. पण इतिहासाचा विपर्यास करणे, इतिहास सोयीने दाखवणे आणि काही खल प्रवृत्तीचे उदात्तीकरण करणे थांबवणे गरजेचे आहे.
मागेल त्याला ‘खुर्ची’ : उदय सामंत
नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनादरम्यान उदय सामंत म्हणाले, मागेल त्याला खुर्ची ही आपल्याकडे योजना आहे, त्यामुळे मंचावरच्या शंभर खुर्च्या भरल्या आहेत. हे शंभरावे नाट्य संमेलन झाल्यावर या पदाधिका-यांची एक बैठक घ्यावी. कलाकारांच्या घरांचा आणि बॅक स्टेज कलावंतांचा प्रश्न आपण मिटवूयात.
विक्रम गोखले यांनी ५ कोटींची दोन एकर जागा वृद्धाश्रम साठी दिलेली आहे. ९ कोटी ७३ लाखांमधील हिस्सा पेन्शनसाठी ठेवण्याचा निर्णय आम्ही नाट्य परिषदेच्या विश्वस्तांनी घेतलेला आहे.