सोलापूर : मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीला मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने सामील होण्याचा निर्धार जिल्ह्यातील मराठा बांधवांनी केला. आरक्षणासाठी आता आरपारची लढाई होईल, असा इशारा समन्वयकांनी दिला. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अन्यथा २० जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.
यावर चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाची छत्रपती शिवाजी प्रशालेत बैठक झाली. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार म्हणाले, मराठा आरक्षणासाठी समाजाने शांततेत मोर्चे काढले. अनेक तरुणांनी बलिदान दिले. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून उपोषण केले. तरीही सरकार यावर त्वरित निर्णय घ्यायला तयार नाही. यासाठी आता आरपारची लढाई ठरली आहे. २० जानेवारीला मुंबईत एकत्र जमण्याचा निर्णय समाज बांधवांनी घेतला आहे. जिल्ह्यातून शेकडो लोक या आंदोलनात सहभागी होतील. यावेळी प्रा. गणेश देशमुख, प्रा.रामदास झोळ, नाना काळे, श्रीकांत डांगे, महादेव गवळी, श्याम गांगर्डे, हेमंत पिंगळे, लहू गायकवाड, चंद्रकांत पवार, सोमनाथ राऊत, ज्ञानेश्वर सपाटे, प्रशांत पाटील, जी. के. देशमुख, सदाशिव पवार, हनमंतु पवार, विजय पोखरकर, राम जाधव, सचिन गुंड, मनीषा नलावडे, शोभना सागर, आदी उपस्थित होते.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी सर्व समन्वयक तालुकानिहाय दौरे करणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील गावपातळीवरचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होतील, असा विश्वास प्रा. देशमुख यांनी व्यक्त केला.