बुलढाणा : एकीकडे देशावर १५० लाख कोटी रुपयांचे कर्ज असतानाच देशाचा जीडीपी चीन, अमेरिकेपेक्षा अधिक असल्याचा दावा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला.
गेल्या दहा वर्षांत देशाचे दरडोई उत्पन्न ९० हजारांवरून १ लाख ८८ हजारांवर गेले आहे. जवळपास दुपटीने त्यात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोविडनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला असून, महागाईचा दरही कमी झाल्याचे कराड म्हणाले. देशाने विकासाकडे वाटचाल केली असून, इंग्रजकालीन गुलामीची चिन्हे दूर सारून भारतीय दृष्टिकोन जपत विकासाचा मार्ग आपण पादाक्रांत करत आहोत. त्यामुळेच कायद्यामध्येही त्यानुषंगाने ३९ हजार सुधारणा केल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे ज्या पद्धतीने पायाभूत सुविधांच्या कामांनी वेग घेतला आहे ते पाहता जनसामान्यांच्या राहणीमानात वाढ होऊन विकासाची संकल्पना स्पष्ट होत आहे. महसुली उत्पन्नही वाढले आहे.
पूर्वी दहाव्या क्रमांकावर असलेली आपली अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर आली असून, २०२६ पर्यंत ती तिस-या स्थानावर जाईल, असे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले.