मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
देशात लोकशाही आहे की नाही, हे ठरवणारा निर्णय असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बुधवारी शिवसेना अपात्रता प्रकरणी निर्णय येणार आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले.
जर न्यायमूर्ती (राहुल नार्वेकर) आरोपीला जाऊन भेटत असतील तर आम्ही त्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी? असा सवाल उद्धव ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेत उबाठा शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
हा खटला आहे तो देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही? हे ठरवणारा निकाल असणार आहे. गेली दोन वर्षे त्यावर चर्चा, सुनावणी, उलट तपासणी सुरू आहे. गेल्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळेत निकाल लावावा असे म्हटले होते. ३१ डिसेंबर तारीख दिली होती. ज्याप्रमाणे सुनावणी सुरू होती तेव्हाच आमच्या लक्षात आले होते की वेळकाढूपणा करत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्या दहा जानेवारीला ११:५९ पर्यंत वेळ खेचतील मग निकाल देतील असे वाटते, असेही ठाकरे म्हणाले.
लवाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत. याचा अर्थ असा होतो की आरोपीच न्यायाधीशाला जाऊन भेटले. ते मुख्यमंत्र्यांना तसे भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना ते भेटले. आरोपीला घरी जाऊन भेटणार असतील तर कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.