पुणे : लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट एका व्यक्तीच्या काळजात कट्यार घुसवल्याचा प्रकार घडला. किरकोळ वादातून विवाह समारंभात वराने मंगल कार्यालय चालकावर कट्यारने वार केला. त्यामुळे विवाहाच्या दिवशीच नवरदेवावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.
करण सणस यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अभिजीत मिरगणे, राहुल सरोदे यासह इतर ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणस यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन भागात मंगल कार्यालय आहे. या ठिकाणी आरोपी नवरदेव अभिजीत याचा विवाह संपन्न झाला होता.
विवाह समारंभानंतर अभिजीत आणि नातेवाईक स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून इतर काही जणांना ये-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकावण्यास सांगितले. या कारणावरून अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घातला आणि सणस यांना शिवीगाळ करुन कट्यारने वार केला.