27.2 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमहाराष्ट्रजानेवारीअखेरपर्यंत जागावाटप

जानेवारीअखेरपर्यंत जागावाटप

मुंबई : प्रतिनिधी
जानेवारीअखेरपर्यंत महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप अंतिम होईल. सध्या ती जागा कोणाकडे आहे, जागा कोणी लढवली तर विजयाची अधिक शक्यता आहे, या मुद्यांचा जागावाटप करताना विचार केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत बोलताना त्यांनी, ज्यांच्या पुढे केस आहे ते ज्यांची केस आहे त्यांना भेटतात, इथेच संशय निर्माण होतो. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, काँग्रेसकडे जास्त जागा आहेत. जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी ८-९ जागांवर लढण्याची चर्चा होऊ शकते. महाराष्ट्रात मविआमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे ही आमची भूमिका आहे. इंडिया आघाडीमधील सर्व घटक पक्ष यांनी एकत्रित आगामी निवडणुकांना सामोरे जावे. प्राथमिक बैठकांत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी सर्व पक्षातील ज्येष्ठ नेते पुढे बैठका घेतील. सध्या इंडिया आघाडीमध्ये सर्व पक्षांची एकमेकांशी सुसंगत अशी भूमिका घेण्याची तयारी असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

ईडीच्या धाडींबद्दल प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, केंद्र सरकार बदलत नाही, तोवर अशा धाडी होत राहणार. विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई होतच राहणार आहे. आमदार रोहित पवार, आमदार रवींद्र वायकर यांच्या संदर्भातदेखील असेच होत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाई करण्यात आली. सरळ असे दिसतेय की, सत्ताधारी पक्षावर कारवाई होत नाही, असेही पवार म्हणाले.

कार्यकाळ असेपर्यंत कार्य करीत राहणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाबद्दल टिप्पणी केली होती. त्याबद्दल विचारले असता त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेबद्दलचा असेल तर अनेक लोकांची उदाहरणे देता येऊ शकतात. मोरारजी देसाई पंतप्रधान होते, तेव्हा त्यांचे वय ८३ होते. त्यांच्या मागे जनतेचे बहुमत होते. त्यामुळे अशा वय वगैरे काढण्याच्या गोष्टी काढू नयेत. जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणे आणि सहका-यांना मदत करणे हे माझे काम आहे. त्यामुळे ते मी करीत राहीन. मी निवडणूक लढणार नाही हे मी जाहीरपणे सांगितले आहे. मला लोकांनी संसदेत पाठवले आहे, त्यामुळे कार्यकाळ असेपर्यंत काम करीत राहणार असल्याचे पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR