नवी दिल्ली : भारताच्या बहिष्कारामुळे मालदीवचे दररोज करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. ज्या देशाचा फक्त महसूल पर्यटक आणि पर्यटनातूनच येतो, त्या देशाची अवस्था बिकट होते हे उघड आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी मालदीवने तेथील प्रवासाचा खर्च निम्म्यावर आणला आहे, तरीही भारतीय तेथे जाण्यास तयार नाहीत.
या संपूर्ण वादापूर्वी मालदीव हे भारतीयांचे आवडते पर्यटन स्थळ होते. दरवर्षी लाखो भारतीय तिथे भेट देत होते. पण भारतीयांनी बहिष्कार टाकल्याने खुद्द मालदीवनेच आपली ४४ हजार कुटुंबे आता अडचणीत आल्याचे म्हटले आहे. भारतीयांच्या नाराजीमुळे त्यांच्या पर्यटन उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलवरही लोकांनी मालदीवला भेट देण्याचे पर्याय शोधणे बंद केले आहे. त्याऐवजी, लक्षद्वीपचा शोध ३४ पटीने वाढला आहे.
मालदीवचा दररोज मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. २०२३ मध्ये, जगभरात प्रवास करणा-या भारतीयांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आणि २०३० पर्यंत भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. गेल्या वर्षी, भारतीयांनी मालदीवमध्ये ३८० मिलियन म्हणजेच सुमारे ३,१५२ कोटी रुपये खर्च केले. याचा अर्थ भारतीयांनी तिथे जाणे बंद केले तर मालदीवचे प्रतिदिन ८.६ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग मार्केटमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या मेक माय ट्रिप या पोर्टलने सांगितले की, लक्षद्वीपसाठी गेल्या एका आठवड्यात चौकशी ३,४०० टक्क्यांनी वाढली आहे. पर्यटकांची उदासीनता पाहून आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी ट्रॅव्हल एजंटांनी मालदीवला भेट देण्याचा खर्चही ४० टक्क्यांनी कमी केला आहे.