छत्रपती संभाजीनगर : १४ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुंबई ते जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा बैलाला धडकून अपघात झाला. या धडकेत तब्बल एक हजार फुटापर्यंत एक्सप्रेसने बैलाला फरफटत नेले. यात बैलाचे अक्षरश: शरीराचे तुकडे झाले. तर वंदे भारत एक्स्प्रेस एक तास रेल्वे रुळावर थांबली होती. यामुळे आत असलेल्या ३५० प्रवाशांना अडकून बसावे लागले. ही घटना शनिवारी सायंकाळी पोटुळ शिवारात घडली. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून हा पहिला अपघात झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस उद्घाटन थाटात पार पडले. लांब पल्ल्याचे अंतर कमी वेळेत पूर्ण करणे या वंदे भारत एक्स्प्रेसचे वैशिष्ट्य आहे. यामुळे प्रवाशांना याचा फायदा होत आहे. दरम्यान, मुंबई ते जालना दरम्यान ३० डिसेंबर रोजी वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली. ५४० प्रवाशांची क्षमता असलेल्या या वंदे भारत एक्स्प्रेसमधून अनेक प्रवासी प्रवास करत आहेत. शनिवार, दिनांक १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मुंबईवरून जालन्याकडे येणा-या वंदे भारत एक्स्प्रेसने रुळावर असलेल्या बैलाने धडक दिली. या अपघातात बैलाच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. यात बैलाचे डोके, पाय अपघात स्थळी विखुरले होते.
वेगात असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा अचानक अपघात झाल्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये असलेले ३५९ प्रवासी घाबरून गेले. अपघात झाल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस तब्बल एक तास रेल्वे थांबली होती. छत्रपती संभाजीनगर विभागाकडे इलेक्ट्रिक राखीव इंजिन असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे रेल्वेत असलेल्या प्रवाशांना उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागले. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वंदे भारत एक्स्प्रेस रुळावर थांबली असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडून जाणारी रेल्वे दौलताबाद रेल्वे स्थानकावर तर मनमाडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी दुसरी रेल्वे लासूर स्टेशन स्थानकावर रोखण्यात आली.