मुंबई : आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलंय. प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली. मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू यांनी उपोषणस्थळावर चर्चा केली. आजच्या भेटीनंतर ही मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारवर दबाव वाढला असून जरांगे आणि बच्चू कडू यांच्या चर्चेतून काय साध्य झालं हा प्रश्न अनुत्तरित आहे.
आज सकाळी अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेल्या बच्चू कडूचा आजचा दौरा अनपेक्षित नसला तरी सरकार दरबारी अजूनही दखलपात्र आहे हे जाणवून देणारा होता. सव्वा तासाच्या चर्चेनंतर जरांगे यांच्या मागण्या आणि त्यातील दुरुस्ती कागदावर नोंदवून बच्चू कडू यांनी सरकारकडे हे सादर करण्याच आश्वासन दिलं. त्यावर जरांगे यांनी चर्चेचे गु-हाळ 7 महिन्यापासून सुरू असल्याचे उत्तर दिलं.
बच्चू कडू यांनी भेटीच्या सुरुवातीलाच आपण मध्यस्थ आणि आंदोलक या दुहेरी भूमिकेत आल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय आपण २० तारखेला आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केलं. त्यामुळे बच्चू कडूंच्या चर्चेतून समस्या सुटणार नाही हे स्पष्ट होतं. मग यातून काय मार्ग निघणार होता हा प्रश्न उपस्थित होतोय.
जरांगे यांनी आजवर लावून धरलेली मागणी, सरसकटला पर्याय म्हणून सग्यासोय-यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही जुनीच मागणी कायम असताना, त्याबाबत सरकारकडे कुठलाही ठाम उपाय नसून देखील बच्चू कडू या चर्चेतून काय नवीन मार्ग काढणार होते? या चर्चेला सरकारचे इतर प्रतिनिधी का नव्हते? सुरुवातीपासून सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंगेश चिवटे यांची अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय होता. या प्रश्नामुळे बच्चू कडू यांची भूमिका सरकारचे प्रतिनिधी म्हणून होती की, सरकार वरती स्वत:चा दबाव निर्माण करण्यासाठी होती?असा सवाल उपस्थित होत आहे.