नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत किमान तापमान ४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. रेल्वे वाहतूक आणि विमान सेवा आजही विस्कळीतच राहिली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १७० उड्डाणांना फटका बसल्याने अनेक प्रवाशांचा विमान प्रवास आजही रेंगाळला.
यात देशांतर्गत आणि विदेशात जाणा-या विमान सेवेचा समावेश आहे. दिल्लीत सुमारे २० रेल्वेगाड्या उशीराने दाखल होत असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.
हवामान खात्याने दिलेल्या इशा-यानुसार, नवी दिल्ली, हरियाना, पंजाबमध्ये १८ जानेवारीपर्यंत धुके आणि थंडीची लाट राहू शकते. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला. बिहारच्या पाटण्यात काश्मीरपेक्षा अधिक थंडी आहे. या ठिकाणी कमाल तापमान १३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, तर जम्मूत कमाल तापमान १६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
देशभरातील बहुतांश भागात धुक्याची चादर पसरल्याने विमानसेवा सलग तिस-या दिवशी विस्कळित राहिली आहे. गेल्या दोन दिवसांतील हवामान पाहता इंडिगोची २२ टक्के विमाने मेट्रो शहरात ठरल्या वेळेत उड्डाणे करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर एअर एशियाचे ३० टक्के विमाने वेळेत जात असल्याचे सांगण्यात आले. इंडिगोकडून दररोज १७६० उड्डाणे होतात त्यापैकी केवळ २२ टक्के म्हणजेच ३८७ विमानांनी ठरल्या वेळेत उड्डाण केले.