नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणा-या मनोज जरांगे यांच्या संपूर्ण मागण्या सरकारने मान्य केल्या असून, सग्यासोय-यांबाबतचा अध्यादेश देखील काढण्यात आला आहे. दरम्यान, यावर आता ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. ‘ओबीसींनो घाबरून जाऊ नका, सगेसोयरे संदर्भात शासनाने काढलेला जीआर म्हणजे, जुनीच बाब नव्याने सांगण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकडे कूच करण्याची गरज नसून, मुंबईतील आंदोलन रद्द करण्यात येत असल्याचे तायवाडे म्हणाले आहेत. ’
सगेसोयरे संदर्भात शासनाने काढलेला जीआर म्हणजे, जुनीच बाब नव्याने सांगणे असे आहे. वडील, आजोबा, पणजोबा यांच्याकडील नातेवाईक म्हणजे सगेसोयरे हा आधीच प्रचलित नियम आहे. त्यामुळे शासनाने जुन्या नियमाचा पुनरुच्चार केला आहे. यापलिकडे काही नसल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.
तर, निर्गमित केलेल्या ३७ लाख कुणबी प्रमाणपत्रांची तारीख सांगा, निर्गमित केलेले ३७ लाख प्रमाणपत्र १९९४ नंतर आजवर दिले आहेत, की जरांगेचे आंदोलन सुरू झाल्यापासून देण्यात आले हे सरकारने स्पष्ट करावे. कुणबी किंवा ओबीसी बांधवांनी घाबरून जाऊ नये. सरकारने ओबीसी समाजाला दिलेले आश्वासन मोडले नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही. तर, आधीच प्रचलित नियमांच्या आधारे प्रमाणपत्र दिले जात असून, ३७ लाख पैकी ९९ टक्के लोकांकडे आधीच प्रमाणपत्र होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास आहे की, कुणबी किंवा ओबीसी समाजाचे कुठेही नुकसान होत नाही. आमचे कोणतेही नुकसान होत नसल्यामुळे आम्ही सध्या तरी कोणतेही आंदोलन करणार नाही. आम्ही मुंबईकडे कूच करणार नाही, असेही बबनराव तायवाडे म्हणाले आहेत.
जरांगे लढ्यात जिंकले; तहामध्ये हरले : हरिभाऊ राठोड
मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारने काढला आहे. मराठा समाजाच्या लढाईला यश मिळाले असल्याची घोषणा देखील मनोज जरांगे यांनी केली. दरम्यान, आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले असल्याचे हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत.