मुंबई : पारंपरिक मैदानी खेळाला पुनरुज्जीवित करून त्याला उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, संयोगी संस्था, क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन जांबोरी मैदान, वरळी येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या स्पर्धेचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास व उद्योजकता, नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिकत आयुक्त अश्विनी जोशी यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आला. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी भोसले, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, एनएसएसचे विद्यार्थी, विविध शाळांचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेसाठी लागणारी सर्व यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या स्पर्धेसाठी लागणा-या खर्चाची तरतूदही राज्य शासनामार्फत करण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंना चांगले बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा उपक्रम आपण सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा महोत्सव राज्यभर साजरा केला जात आहे.