अमरावती : अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांची दखल न घेतल्याने एका आंदोलकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. अमरावतीच्या मोर्शी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या मंडपातच एका प्रकल्पग्रस्ताने आत्महत्या केली आहे.
गोपाल दहिवडे असे या आत्महत्या करणा-या आंदोलक प्रकल्पग्रस्ताचे नाव असून ते मूळचे टाकरखेड येथील रहिवासी आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मोर्शी तहसील कार्यालयासमोर २५२ दिवसांपासून आंदोलन पुकारले होते. मात्र प्रशासनाने या आंदोलनाची साधी दखल देखील न घेतल्याने गोपाल दहिवडे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. यावेळी त्यांनी चिठ्ठी लिहून आपल्या मृत्यूमागे शासन जवाबदार असल्याचे म्हटले आहे.
अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना २५ ते ३० लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी, ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाहीत. त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे, ज्या शेतक-यांना अजूनही मोबदला मिळाला नाही, अशा शेतक-यांना आजच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावे. या सर्व शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्याची शासनाकडून पूर्तता न झाल्यामुळे शासनाच्या आणि प्रशासनाच्या विरोधात २५२ दिवसापासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.