मुंबई – मराठा आंदोलनाचे हे मोठे यश असल्याचं सांगत मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधवांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करुन जल्लोष साजरा केला. नवी मुंबईतील वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे याबाबतचा अध्यादेशही दिला. त्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सरकारच्या अध्यादेशावर बोलताना, जरांगेंवर पुन्हा याच प्रश्नासाठी आंदोनलाची वेळ येऊ नये, असे म्हटले.
राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार मराठा समाजाला सरसकटकिंवा सगेसोय-यांना आरक्षणाचे दाखले मिळतील का, त्या आदेशानुसार हे मार्गी लागतंय का हे आगामी काही दिवसांत कळेल. आमची एवढीच इच्छा आहे, सरकारने आज आश्वासनं दिले आहेत,किंवा अध्यादेश काढले आहेत, मुख्यमंत्री तिथे गेले आहेत. पण, मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा याच प्रश्नावरुन आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आरक्षणाच्या अध्यादेश निर्णयावर आणि मुख्यमंर्त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेची यासंदर्भातील भूमिका स्पष्ट आहे, याबाबत आम्ही काहीही राजकारण करणार नाही, आणि केलेलंही नाही. मराठा समाज, धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा संपला पाहिजे. त्यासोबतच, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. या पद्धतीने जर हा प्रश्न सुटला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असे म्हणत संजय राऊत यांनी आरक्षणाच्या अध्यादेशाचं स्वागत करताना आपली भूमिका स्पष्ट केली.