लातूर : प्रतिनिधी
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही या दिवशी देशात लागू झाली लोक स्वातंत्र्याचा हा उस्तव आहे. या माध्यमातून लोकशाही अधिक सक्षम करणे हा विचार अंगीकारणे गरजेचे आहे, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त बाभळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ध्वजारोहण केले. प्रारंभी आमदार अमित देशमुख यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, बाभळगावच्या सरपंच प्रिया सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ बाभळगावचे सचिव शाम देशमुख, बाभळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन महादेव जटाळ, व्यंकटराव देशमुख महाविद्यालय प्राचार्य दुष्यंत कटारे, दयानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर राठोड, मंडळ अधिकारी संजीव घाडगे, ग्रामसेवक अनंत मडके, तलाठी गोविंद तावरे, अविनाश देशमुख, सचिन मस्के, सुधाकर जोशी, सादुराम मस्के, जीवनराव देशमुख, एन. आर. देशमुख, सुरेश देशमुख, गंगाधर जाधव, गणपतराव भाडळे, अशोक चौधरी, बाभळगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, बाभळगाव हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुणांसाठी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात व देशात आपल्या गावाने नावलौकिक मिळवला आहे याचे श्रेय प्रत्येक गावक-यांचे आहे. गावाच गावपण गावकरी निश्चित करतात आपले गाव ही आपली प्राथमिकता आहे. या गावात खूप काही करण्यासारखं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही या दिवशी देशात लागू झाली लोक स्वातंत्र्याचा हा उस्तव आहे. लोकशाही अधिक सक्षम करणे हा विचार अंगीकारणे गरजेचे आहे. वृक्षतोड करणार नाही, पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करणार, कचरा इतरत्र टाकणार नाही, बंधुभाव सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे असा आपण संकल्प करावा असे त्यांनी आवाहन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लहान मुले विद्यार्थी ही उद्याची पिढी आहेत ते सुशिक्षित निर्माण झाली पाहिजे,
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, बाबळगाव ग्रामपंचायत व सोसायटीने गोरगरिबाला न्याय मिळवून दिला पाहिजे शेतक-यांसाठीच्या योजना पारदर्शकपणे त्यांच्या दारापर्यंत पोहोचवल्या जाव्यात असे सांगून त्यांनी सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके, नायब तहसीलदार सुधीर देशमुख आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी बाभळगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.