पुणे : आयटी हब हिंजवडीत एका आयटी इंजिनीअर महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करणा-या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोघेही लखनौचे असून आयटी कंपनीत काम करायचे. दोन दिवसांपासून ते लॉजमध्ये राहायला होते, लखनौवरून आलेल्या ऋषभ निगम याने महिलेची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर तो मुंबईला पळून गेला. मात्र पळून जाताना तो मुंबई पोलिसांच्या हातून सुटू शकला नाही. मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी दरम्यान पिस्टलसह अटक केली. प्रेम प्रकरणातून महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. आता पोलिस या ऋषभ निगमची चौकशी करतील. त्यानंतर मात्र रात्री त्यांच्यात नेमके कशावरून वाद झाले? त्यातून हत्या कशी घडली? बंदूक कुठून आणली? याबाबतचा उलगडा समोर येईल.
पुण्यातील हिंजवडी परिसरात अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत. देशातील विविध भागांतून अनेक इंजिनीअर तरुण या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी येत असतात. देशाच्या कानाकोप-यातून आलेले तरुण एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यानंतर काही धुसफूस झाली की टोकाचे निर्णय घेतात. आतापर्यंत या परिसरातील इंजिनीअर तरुणांच्या संदर्भातील अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. अशा एका प्रेमप्रकरणातून या आयटी इंजिनीअर महिलेची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.