बार्शी / प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील अत्यंत गरीब, मागासवर्गीय अनुसूचित जातीतील हिंदु खाटीक कुटुंबातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलीवर त्याच गावातील अल्ताफ महेबूब कुरेशी या नराधमाने सलग पाच दिवस अत्याचार केला. सदर संशयित आरोपीस तात्काळ फाशी देण्यात यावी व कुटुंबीयास शासनाकडून मदत मिळावी, या मागणीसाठी बार्शी शहर व तालुका हिंदू खाटीक समाजाच्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढून बार्शीचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिडीत व आरोपीचे घर एकमेकांच्या समोर आहे.
त्यामुळे पिडीत कुटुंबाची सोय इतरत्र करावी अथवा पिडीत कुटुंबीयास पोलीस संरक्षण देण्यात यावे, पिडीतकुटुंबीयास शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी, पिडीत बालिकेच्या पुनर्वसनाचा (शैक्षणिक आदी) संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे व आरोपीला तात्काळ फाशी द्यावी, पिडीत कुटुंबियात अल्पवयीन ४ मुली, १ मुलगा असल्याने त्यांना बाल संगोपन योजनेअंतर्गत (स्पेशल केस खाली) मदत देण्यात यावी, संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत आरोपीला व कुटुंबीयांना गावबंदी करण्यात यावी जेणेकरून गावात धार्मिक/जातीय तेढ अथवा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी, या मागण्या निवेदनात केल्या आहेत.
हे निवेदन बाशींचे तहसीलदार कार्यालय मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. यावेळी माजी खासदार शिवाजी कांबळे व बार्शी शहर व तालुक्यातील सर्व हिंदू खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बार्शीत हिंदू खाटीक समाजाच्या निघालेल्या मूक मोर्चास विश्व हिंदू परिषद, जय शिवराय प्रतिष्ठान, सकल मराठा समाज, वंचित बहुजन आघाडी, प्रहार संघटना, जाणीव फाउंडेशन, छत्रपती ग्रुप आदींनी जाहीर पाठिंबाचे पत्र दिले.