वाराणसी : वाराणसीतल्या ज्ञानवापी परिसरातल्या व्यासजी तळघरात अखेर ३१ वर्षांनी पूजा करण्यात आली. तसेच आज सकाळीच अनेक लोक या ठिकाणी पूजा करण्यासाठी पोहोचले आहेत. ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात पहाटे दोन वाजता पूजा आणि आरती करण्यात आली. ३० वर्षांनी ही घटना घडली आहे.
आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन केल्याचे भक्तांचे म्हणणे आहे. तसेच वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर बॅरिकेडही हटवण्यात आले आहेत. ३१ जानेवारी या दिवशी न्यायालयाने हिंदू पक्षकार ज्ञानवापी परिसरात पूजाअर्चा करू शकतात असा आदेश दिला होता. हा आदेश म्हणजे मोठा दिलासा आहे असे हिंदू पक्षकारांनीही म्हटले होते. या आदेशानंतर पहाटे दोन वाजता व्यासजी तळघरात पूजा करण्यात आली.
मुस्लिम पक्षकार वरच्या कोर्टात जाणार
मुस्लिम पक्षकारांनी जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू पक्षकारांचे वकील मदन मोहन यादव यांनी पीटीआयला सांगितले की जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेस यांनी व्यासजी तळघरात पूजा करण्याचा अधिकार असल्याचा आदेश दिला आहे. त्यानंतरच इथे पूजा आणि आरती करण्यात आली. या तळघरात असलेल्या मूर्तींची पूजा आणि आरती करण्यासाठी न्यायालयाने सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र त्याच्या आतच या ठिकाणी पूजा आणि आरती करण्यात आली.
आम्हाला मनस्वी आनंद : जितेंद्र नाथ व्यास
आम्हाला पूजाअर्चा करण्याचा अधिकार मिळाला याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. ज्ञानवापीच्या तळघरात आम्ही पूजा केली. देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार आम्हाला मिळाला आहे. व्यास कुटुंबीय आणि पाच पुजारी यावेळी उपस्थित होते. तसेच आयुक्तही उपस्थित होते. त्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही तळघरात पूजा आणि आरती केली असे जितेंद्र नाथ व्यास यांनी सांगितले. जितेंद्र नाथ हे व्यास कुटुंबातले आहेत.