रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील तत्तापूर येथे राजरोसपणे विक्री होत असलेल्या देशी विदेशी गावठी दारू तात्काळ बंद करावी अन्यथा दि .१० फेब्रुवारी रोजी पोलीस दुरुक्षेत्राच्यासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह, रेणापूरच्या तहसिलदार ‘ पोलीस ठाण्याकडे तत्तापूर येथील महिलांनी दि .१ फेब्रुवारी रोजी दिले आहे.
तालुक्यातील तत्तापूर येथे सहा ते सात घरांमध्ये देशी विदेशी हातभट्टी दारु राजरोसपणे विक्री केली जाते. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत . दारुसाठी पुरुष घरातील संसारोपयोगी वस्तू विकत असल्यामुळे दररोज घरात भांडणे होत आहेत. महिलांवर मानसिक अत्याचार करीत आहेत. दाऊ पिऊन होणा-या छळास कंटाळून महीला आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहेत.याचा परीणाम लहान बालकाच्या बाल मनावर होत आहे.
या सर्व बाबींचा विचार करुन तत्तापूर येथील विक्री होणारी दारु दि . ९ फेब्रुवारीपर्यंत बंद केली नाही तर दि . १० फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर कांता वायदंडे, पुणम पाडूळे, नंदूबाई पाडूळे, राणी वायदंडे, उषाबाई पाडूळे, कालींदाबाई वायदंडे, सरस्वती वायदंडे, प्रभावती वायदंडे, शोभा वायदंडे, जनाबाई वायदंडे यांच्यासह महिलांच्या स्वाक्ष-या आहेत.