नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेस उद्यापासून (दि. ६) सुरुवात होत आहे. यानिमित्ताने अनेक वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल झाले आहेत. सुमारे पाच लाख भाविक आणि ६०० पेक्षाही अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार त्र्यंबकमध्ये घडला आहे.
निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला आलेल्या वारक-यांची त्र्यंबकेश्वरमध्ये अडवणूक केल्याचा आरोप वारक-यांकडून करण्यात आला आहे. काही साधूंनी शिवीगाळ करत हाकलून दिल्याचे वारक-यांंचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी वारकरी थांबले होते त्या ठिकाणी येऊन साधूंनी शिवीगाळ केल्याचे समजते.
साधूंवर कडक कारवाईची मागणी
त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आलेल्या भाविकांचे निवासस्थान ठरलेले असते. दरवर्षीप्रमाणे वारक-यांनी आपापल्या जागेवर आपले तंबू बांधले होते. मात्र काही साधूंनी येऊन ही जागा आमची आहे, असे म्हणत दमदाटी करून वारक-यांना शिवीगाळ केली. तसेच हातात चाकू घेऊन साधूंनी वारक-यांचे तंबू उखडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या साधूंवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वारक-यांनी केली आहे.