मुंबई : बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये एका महिला ऊसतोड मजुरावर अत्याचार झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरून प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी या मुद्यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील चिंता व्यक्त केली आहे.
‘काल भूम (जि. उस्मानाबाद) येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका पारधी समाजाच्या महिलेवर २ पोलिसांनी अत्याचार केला आहे. त्यातील १ आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलिस शिपाई आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्याच ओळीत म्हटले आहे. पुढे या प्रकरणासंदर्भात बोलताना, पीडित महिला ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात असताना बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा दीर थांबले असताना त्यांना ‘चोर’ असल्याच्या संशयावरून गाडीत बसवून नेले आणि पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपी पोलिसांच्या मोबाईलवर पैसे दिले. यानंतर पुन्हा आरोपी पोलिसाने महिलेला दमदाटी करून महिलेवर अत्याचार केला आणि पीडितेला धमकावले, अशी माहिती दिली.
खुलेआम पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार
कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाचा संदर्भही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. एकीकडे खुलेआम पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच भक्षक होतात, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. या सर्व प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेऊन त्यांना धीर दिला. ‘वंचित’चे नेते अरुण जाधव यांनी हे प्रकरण लावून धरले, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
फडणवीसांवर हल्लाबोल
प्रकाश आंबेडकरांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका सामान्य जनतेला बसतोय. गृहमंत्र्यांचे हे सपशेल अपयश आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जावी. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर होत चाललाय, हे स्पष्ट होत असल्याचेही या पोस्टच्या शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.