मुंबई : महिलांना साडी देण्याचे टेंडर सरकारने काढले आहे. साडी घोटाळा सरकार करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे. १ कोटी साडींचे वाटप करून सरकार मते घेण्याचा प्रयत्न करतेय असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. तसेच, १ लाख १४ हजार मोबाईल खरेदीसाठी १५५ कोटींची तरतूद केल्याचा आरोप देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
१ कोटी साडींचे वाटप करून सरकार मते घेण्याचा प्रयत्न करतेय असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. आता महिलांना साडीची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा सुरू झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, या सरकारवर साडी नेसून आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे. साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळे महिलांना साडी भेट देऊन मते मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार आता करत आहे. यावरून साडी घोटाळा आता प्रकाशात आला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. दिवसेंदिवस सरकारचे घोटाळे समोर येत आहेत. सरकारने क्लृप्त्या लढवणे आणि घोटाळे करणे सुरू केले आहे.
मंत्रालयात गुंड निलेश घायवाळ रील तयार करतो. त्याच्याबरोबर त्याचे इतर गुंड देखील आहेत. हा कशी काय एवढी हिंमत करतो? मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो हे कसं काय शक्य होतंय? मुख्यमंत्र्यांना गुंडांना बरोबर घ्यावे लागते? अशी देखील टीका त्यांनी केली आहे.
अॅम्ब्युलन्स घोटाळा समोर आणला
अॅम्ब्युलन्स घोटाळा मी समोर आणला होता. आता अंगणवाडी सेविकांचा विषय मांडत आहे. मर्जीतील कंपनीला यांनी मोबाईल खरेदी करण्यासाठी कंत्राट दिले आहे. कोट्यवधी रुपयांचे काम आहे. दिल्लीची कंपनी आहे ही. ही कुणाच्या जवळची आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्या कंपनीला पैसे देण्यापेक्षा अंगणवाडी सेविकांना पैसे का दिले नाहीत? यांना कमिशन आणि वसुली यासाठी त्यांनी हा घोटाळा केला आहे.