रांची : केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास देशातील जातीनिहाय जनगणना केली जाईल आणि आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल अशी घोषणा भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान रांची येथील सभेत राहुल गांधी यांनी केली आहे.
रांची येथील शहीद मैदानावर ही सभा झाली. यावेळी रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी वरील आश्वासन दिले आहे. राहुल गांधी यांनी यावेळी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका देखील केली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, जाती निहाय जनगणना करण्याची मागणी होत आहे आणि ओबीसी, दलित आणि आदिवासींना अधिकार देण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान म्हणतात की, कोणतीही जात अस्तित्वात नाही, मात्र जेव्हा मते मागण्याची वेळ येते तेव्हा पंतप्रधान म्हणतात की ते ओबीसी आहेत.
नरेन्द्र मोदी म्हणतात की ते ओबीसी आहेत, परंतु जेव्हा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली की ते सांगतात की फक्त दोन जात आहेत- गरीब आणि श्रीमंत.
राहुल गांधी यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या सभेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी म्हणतात की, आजकाल ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण मिळू शकत नाही. हे पन्नास टक्क्यांचे लिमीट काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे सरकार काढून फेकून देईल.