मुंबई : शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी हा कट रचला जात आहे, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर केला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह हे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे
.
निवडणूक आयोगावर ताशेरे ओढताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे पर्याय मागितले होते पण त्यांनी आम्हाला पर्याय दिलेच नाहीत. आमच्याकडे तसं पत्र आहे. याचाच अर्थ निवडणूक आयोग एकतर खोटं तरी बोलतोय किंवा निवडणूक आयोग विसरभोळा आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना तीन पर्याय दिले होते पण त्याकडे लक्षच दिलं गेलं नाही असे आव्हाड म्हणाले.
तसेच, जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, शरद पवारांना संपविण्यासाठी त्यांची राजकीय हत्या करण्यासाठी, तसेच त्यांचं राजकीय वजन कमी करण्यासाठी किती मोठा कट रचला जातोय. पण, यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना किती दुखावल्या जातायत याची कल्पना निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगासारखी महत्त्वाची संस्था जर कायदेशीररीत्या चालणार नसेल आणि बेकायदेशीररीत्या निर्णय घेणार असेल तर हे सगळं हास्यास्पद आहे, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे. ८४ वर्षांच्या माणसाला संपविण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही, अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले आहेत.
निवडणूक आयोग खोटे बोलला
आम्ही निवडणूक आयोगाला पर्याय दिले होते. पण, निवडणूक आयोग म्हणतो की दोन्ही पक्षांनी पर्यायच दिले नव्हते. याचाच अर्थ निवडणूक आयोग खोटं बोलतोय. निवडणूक आयोगासारखी महत्त्वाची संस्था जर कायदेशीररीत्या चालणार नसेल आणि बेकायदेशीररीत्या निर्णय घेणार असेल तर हे सगळं हास्यास्पद आहे, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. तसेच, निवडणूक आयोगाचा हा निर्णय आपल्याला मान्य नाही असेही यावेळी बोलताना ते म्हणाले.