आळंदी : माझे जीवन समाजासाठी अर्पण केले असून समाजालाच मायबाप मानले आहे. समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही. आगामी काळातही समाजासाठीच लढणार आहे. आरक्षण भेटल्यावर मराठा समाजाचे क्लासवन अधिकारी झालेले पहायचे आहे.
त्यांच्या चेह-यावरील आनंद पाहायचा आहे. त्यामुळे जोपर्यंत कायद्यात दुरुस्ती होत नाही तोपर्यंत इंचभरही मागे हटणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र आळंदीत मनोज जरांगे पाटील यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी फटाक्यांच्या आतषबाजीत जरांगे पाटलांचे जंगी स्वागत करून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान शेलपिंपळगाव, शेलगाव, वडगाव-घेनंद गावांत जरांगे पाटलांचे स्थानिकांनी स्वागत करून सत्कार केला.
जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने मराठ्यांची मुलं मुंबईला गेली. जो मराठा आरक्षणासाठी कायदा लागतो, तो राज्यात सापडला आहे. त्यासाठी अधिवेशनात सगेसोयरे कायदा पारित करायचा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पक्षांतील आमदारांनी हा कायदा मंजूर होण्यासाठी मराठ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.