नवी दिल्ली : देशात सुरू झालेली लोकशाही, तिला ताकद देण्याचे काम नेहरूंनी केले. देशाचा चेहरा बदलण्याचे काम नेहरूंनी केले. त्यात योगदान देणा-या व्यक्तीबद्दल पंतप्रधान सभागृहात बोलले ते योग्य नाही. नेहरू, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काही ना काही चांगले काम केले आहे, असे शरद पवार म्हणाले.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निकाल दिल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा माध्यमांच्या समोर आले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले.
आज मोदींचे भाषण ऐकून मला दु:ख झाले असे त्यांनी म्हटले तसेच नेहरुंचे योगदान नाकारता येणार नाही, असे त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या विद्यार्थी आघाडीच्या वतीने शिक्षण आणि बेरोजगारी याबाबत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान मोदींनी नुकतीच जवाहरलाल नेहरुंवर टीका केली त्याला उत्तर दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या आणि शैक्षणिक संस्थांमधील विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
पवार म्हणाले, संसदेच सत्र सुरू आहे तिथे पंतप्रधान बोलत होते त्यामुळे मला यायला उशीर झाला. पंतप्रधानांचे भाषण ऐकल्यावर मला दु:ख झाले. पंतप्रधान देशाचे पंतप्रधान असतात, कुठल्या एका पक्षाचे नसतात. आपण पंडित नेहरू यांनी केलेल्या कामांकडे डोळेझाक करू शकत नाही. त्यांनी देशासाठी काम केले.