लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील महार्माग व राज्य मार्गाचे विस्तारीकरण झाल्यामुळे या रस्त्यावरून जाणा-या वाहनांचा वेग वाढला असला तरी प्रवाशांचा मात्र जीव जात आहे. हे रस्ते डेंजर झोन बनत चालले आहे. त्यामुळे रस्त्याकडेने चालणेही अवघड झाले आहे. या स्टार मार्गावर अनेकांचा बळी गेला आहेत. रस्ता चकचकीत झाले असले तरी हे मार्ग मात्र वाढत्या दुर्घटनांमुळे अपघातप्रवण क्षेत्र बनत चालले आहेत.
लातूर जिल्ह्यातून जाणा-या नागपूर सोलापूर, नांदेड जळकोट उदगीर जहिराबाद, लातूर अंबाजोगाई, लातूर उमरगा, निलंगा तोगरी, लातूर निलंगा जहिराबाद, आदी महामार्ग व राज्य मार्गाचे रुंदीकरण व नुतनीकरण झाले आहे. त्यामुळे रस्ते चारपदरी, दुहेरी झाले आहेत. त्यामुळे नागपूर, नांदेड, अंबाजोगाई, तुळजापूर, जहिराबाद उदगीर उमरगा आदी ठिकाणी जाणारी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. वाहतुकीस रस्ता चांगला झाला असल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. या महामार्ग व राज्य मार्गावर अपघातासारख्या घटना घडू नयेत, यासाठी काय उपायोजना करता येतील या अनुषंगाने प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. वाहने सुसाट धावत असल्याने गेल्या वर्षभरात अनेकांचा बळी गेला आहे.
वाहतूक पोलिसांसह, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या मार्गावर धावणा-या वाहनांची तपासणी करण्याबरोबरच वाहनांच्या वेगावर ही करडी नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच पहाटे व सायंकाळच्या वेळेस या मार्गावर फिरावयास जाणा-या नागरिकांची संख्या अधिक दिसून येत आहे. तेंव्हा शक्यतो या मार्गावर नागरिकांनी फिरावयास जाणे टाळले पाहीजे.