मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे, त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पण, यावेळी कधी नव्हे एवढ्या खालच्या पातळीवर राज्याचे राजकारण जाऊन पोहोचले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज्यातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका करताना चक्क कुत्र्याची उपमा देण्यात येत आहे. मागील दोन दिवसांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत टीका करताना याचा उल्लेख केला जात आहे. एखाद्या गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, आणि त्यानंतर एकमेकांना कुत्रे म्हणण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे.
तुम्ही कुत्रे, दिल्लीत जाऊन शेपटी हलवतात : संजय राऊत
फडणवीस यांच्या याच टीकेला उत्तर देताना संजय राऊत हणाले की, ‘गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिल्लू आहे का, अभिजित घोसाळकरांची पत्नी, त्यांची लहान मुलगी, त्यांचे माता-पिता ही कुत्र्याची पिल्ले आहेत का?, कुत्रे तुम्ही आहात दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात, असे राऊत म्हणाले.
पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये : नितेश राणे
संजय राऊत यांनी टीका केल्यावर त्यांच्या टीकेला लगेचच भाजप नेत्यांकडून उत्तर देण्यात आले. याची सुरुवात नितेश राणे यांनी केली. ‘महाराष्ट्रात कुणाचे राज्य हे सर्वांना ठावूक आहे! …उबाठातील आपसी गँगवॉरचे खापर फडणवीस साहेबांवर फोडू नका. तसेही शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये. नाहीतर नसबंदी करायला लागेल!… असे नितेश राणे म्हणाले.
आयुष्यभर शरद पवारांसमोर शेपटी हलवली : प्रसाद लाड
नितेश राणे यांच्यानंतर लगेचच भाजप आमदार प्रसाद लाड यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. ‘‘संजय राऊत यांना मी सांगतो की, ज्याने आयुष्यभर शरद पवार यांच्यासमोर शेपटी हलवली, त्याला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याचा बिलकुल अधिकार नाही. ज्यावेळी राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, त्यावेळी या राज्यात गांडूचं राज्य होते. ज्यात हिरे हत्याकांड, दिशा सालियन हत्याकांड असेल, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण असेल, एका उद्योजकाच्या घराबाहेर पोलिसांच्या माध्यमातून बॉम्ब लावण्याचा प्रकार असेल. त्यामुळे गृहखाते कसे चालवायचे हे संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
दिल्लीश्वरासमोर कुत्र्यासारखी शेपटी हलवतात : उद्धव ठाकरे
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देखील फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांना कलंक, फडतूस शब्द वापरले आहेत. आता माझ्याकडे शब्दच नाहीत. पण आता गृहमंत्री मनोरुग्ण म्हणून लाभला आहे का?, श्वान गाडीखाली आल्यावर राजीनामा देऊ का असे फडणवीस म्हणत आहेत. कुत्रा काय सगळ्या प्राण्यांची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दिल्लीश्वरासमोर कुत्र्यासारखी शेपटी हलवतात, असे ठाकरे म्हणाले.