अबुधाबी : मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असते. तिस-या टर्ममध्ये मी भारताला तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होत आहे. कोठेही संकट आले तर सर्वांत लवकर पोहोचणा-या देशांमध्ये भारताचे नाव असते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते अबूधाबीतील ‘अहलान मोदी’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी हजारो भारतीय उपस्थित होते.
पीएम मोदी म्हणाले, युक्रेन, सुडानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे आणले. विदेशातील भारतीयांसाठीही सरकार दिवसरात्र काम करते. आज भारताला जग विश्वबंधू म्हणून ओळखते. आज तुम्ही मेहनत करत आहात. अबूधाबीमध्ये भारतीयांनी इतिहास रचला. युईएच्या विकासात भारताचा मोठा वाटा आहे. एकमेंकांच्या विकासात दोन्हीही देशांनी एकमेंकांना सहाय्य केले असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. यावेळी पीएम मोदींनी ‘सीबीएसई’चे नवे कार्यालय युएईमध्ये असेल अशी घोषणाही केली आहे. पीएम मोदींनी अबूधाबीतील या कार्यक्रमात भारत माता की जयच्या जोरदार घोषणा दिल्या. शिवाय भारतात सुरु असलेल्या विकासाचा मोदींनी पाढाच वाचला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पीएम मोदी लोकांची भेट घेण्यासाठी थेट त्यांच्यामध्ये पोहोचले.
मला २०१५ ची पहिली यात्रा आठवते. मी केंद्र सरकारमध्ये सत्तेत येऊन फार कालावधी झाला नव्हता. २-३ दशकानंतर भारतीय पंतप्रधान इथे आला होता. माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणही नवे होते. तेव्हा त्यांनी माझा सत्कार केला होता. तो सत्कार केवळ माझा नव्हता तर १४० कोटी भारतीयांचा होता. युएईतील प्रत्येक भारतीयाचा तो सत्कार होता. तो एक दिवस होता त्यानंतर आजचा एक दिवस आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मी सातव्यांदा इथे आलो असे म्हणत पीएम मोदींनी २०१५ च्या आठवणींना उजाळा दिला.
मंदिरासाठी प्रस्ताव आणि क्षणार्धात होकार
माझे भाग्य आहे की, युएईने त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. हा केवळ माझाच सन्मान नाही. तर संपूर्ण भारत देशाचा सन्मान आहेत. आजही मी जेव्हा युएईच्या प्रमुखांना भेटतो तेव्हा ते भारतीयांचे कौतुक करतात. मी तुमच्याप्रती असलेले प्रेम अनुभवत असतो. मी अबूधाबीत एका मंदिरात प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी क्षणार्धात होकार दिला. ज्या जमिनीवर तुम्ही रेष ओढाल ती जमीन मी तुम्हाला देऊन टाकेन असे ते मला म्हणाले, असेही मोदींनी स्पष्ट केले.