नवी दिल्ली : बिल्किस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवर ताषेरे ओढले होते. बिल्किस बानोच्या अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय चुकीचा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. दरम्यान, आता गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
गुजरात सरकारकडून दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेत मोठे दावे करण्यात आले आहेत. शिवाय काही मागण्याही करण्यात आल्या आहेत. गुजरात सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे हटवावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आम्ही निर्णय घेतले असल्याचा दावा गुजरात सरकारने पुनर्विचार याचिकेतून केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना गुजरात सरकारवर ताषेरे ओढेले होते. ‘‘बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हा जरी गुजरातमध्ये घडला होता. मात्र महाराष्ट्रात या प्रकरणी आरोपींवर खटला चालवण्यात आला होता आणि त्यांना शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. त्यामुळे गुजरात सरकारला आरोपींची शिक्षा माफ करण्याचा अधिकार नाही. या प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारच्या अधिकारात येतो. त्यामुळेच गुजरात सरकारने या ११ आरोपींची शिक्षा माफ करण्याचा घेतलेला निर्णय रद्द ठरवला जात आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.