नवी दिल्ली : जगासह देशात पण सायबर फसवणुकीचे प्रकरण वाढत आहे. सायबर भामटे ओटीपी मागून अथवा इतर मार्गाने फसवणूक करतात. याविरोधात अनेकदा तक्रारी होतात. पण ऑनलाईन चोरलेला पैसा काही परत मिळत नाही. पण त्यावर केंद्र सरकार जालीम उपाय करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार सायबर भामट्यांना धडा शिकविण्यासाठी प्लॅन आखत आहे.
सरकार बँकांच्या मदतीने नवीन मार्गदर्शक तत्वे आणण्याच्या तयारीत आहे. बँका आणि आर्थिक संस्था लवकरच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांना आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांचा उलगडा करणे आणि खात्यांचा माग काढणे सोपे होणार आहे. या प्रणालीमुळे ज्यांचा पैसा ऑनलाईन चोरी करण्यात आला आहे. तो परत करता येईल.
याप्रकरणी अर्थमंत्रालयात अधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत आर्थिक सेवा विभागाचे सचिव आणि बँकांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावर्षात आर्थिक व्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आली. त्यामुळे आर्थिक सेवा सुरक्षिततेसंबंधी उपाय योजना करण्यावर भर देण्यात आला आहे.
सरकार आणि बँका आता ‘एसओपी’ वर काम करणार आहे. ‘एसओपी’ विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामाध्यमातून फसवणूकदारांना त्यांचा पैसा परत करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच प्रणाली विकसीत करण्यात येईल. त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालता येईल. ज्यांची फसवणूक झाली त्यांची रक्कम परत करता येईल.