मुंबई : राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे विरोधक राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी आक्रमक झाले. महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या पाय-यांवर ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ तरुणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडलाय ड्रग्जचा बाजार. शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
विरोधकांनी याप्रसंगी आज का राज गुंडाराज, गुंडांना पोसणा-या, राजकीय आश्रय देणा-या, ‘वर्षा’वर गुंडांना संरक्षण देणा-या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर सरकारला घेरत विधान भवनाच्या पाय-यांवर जोरदार निदर्शने केली.
यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, भाई जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड, माधवराव पाटील जवळगावकर, जयश्री जाधव, बळवंत वानखेडे, संजय जगताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिन अहिर, नरेंद्र दराडे, वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) अनिल देशमुख, यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या विरोधात घोषणा लिहिलेले फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.