सोलापूर : शहरातील विविध भागांत निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येवर महापालिकेने तत्काळ तोडगा काढावा; अन्यथा महापालिकेसमोर शहरातील साचलेला कचरा टाकून गलथान कारभाराचा निषेध करत आंदोलन करण्याचा इशारा मार्ग फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष राठोड दिला आहे. याबाबतचे निवेदन महापालिका उपायुक्त शशिकांत भोसले यांना देण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात मध्यवर्ती ठिकाणी व विविध भागांत उघड्यावर कचरा साचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराचे सौंदर्य अशोभनीय झाले आहे. मुळात शहरातून घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी ज्या घंटागाडी नेमलेल्या आहेत त्यांच्या कामात हलगर्जीपणा जाणवतो. दैनंदिन कचरा संकलनाकरिता शहरातील प्रत्येक भागात घंटागाडी पोहोचणे अपेक्षित आहे.
परंतु, अनेक भागांत घंटागाडी नियमित पोहोचत नसल्याच्या तक्रारी मार्ग फाऊंडेशनकडे येत आहेत. महापालिकेमार्फत मिळकतदारांकडून शहर स्वच्छतेसाठी कर आकारला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनदेखील ‘स्वच्छ भारत’ अभियान गेल्या अनेक वर्षांपासून राबविले जात आहे. त्यामानाने शहराची कचरा संकलन व प्राथमिक स्वच्छतेबाबतीत कार्यतत्परता दिसून येत नाही. सध्याची स्थिती अतिशय गंभीर आहे. यावर महापालिकेने मार्ग काढावा; अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी अमोल कांबळे, असिफ यत्नाळ, अदिल शेख, अजय चव्हाण उपस्थित होते.पूर्वी महापालिकेच्यावतीने घरोघरी कचरा संकलन व वर्गीकरण करण्याकरिता जनजागृती केली जात होती. आता ती बंद झाली आहे.